संवाददाता : नवनाथ आव्हाड
एमआयडीसीच्या निकृष्ट दर्जाच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करा; दोषींवर कठोर कारवाईची उद्योजकांची मागणी :
सिन्नर एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या निकृष्ट दर्जाबाबत उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या सर्व कामांची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी उद्योजकांकडून करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी एल अँड टी फाट्यावर एमआयडीसीतर्फे लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला डिजिटल दिशादर्शक फलक अवघ्या काही दिवसांतच फाउंडेशनसह वाऱ्याच्या झोताने कोसळला. ही घटना अत्यंत गंभीर असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे संबंधित कामाच्या गुणवत्तेबाबत आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
तसेच एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असतानाही अवघ्या काही आठवड्यांतच रस्त्यांची पुन्हा दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याची भावना उद्योजकांमध्ये निर्माण झाली असून, निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे उद्योगांना आर्थिक फटका बसत असल्याचेही उद्योजकांनी नमूद केले आहे.
उद्योजकांनी या सर्व प्रकरणांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून निकृष्ट दर्जाची कामे करणारे ठेकेदार, संबंधित अधिकारी तसेच कामाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. झालेल्या आर्थिक नुकसानीचा तसेच भविष्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्याचा विचार करून दोषींवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.
सिन्नर एमआयडीसी हा राज्यातील महत्त्वाचा औद्योगिक परिसर असून, येथील उद्योजकांना दर्जेदार, सुरक्षित आणि टिकाऊ पायाभूत सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे अशा निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी एमआयडीसी प्रशासनाने सर्व विकासकामांचे तांत्रिक लेखापरीक्षण (Technical Audit) करून गुणवत्तेची खात्री करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यातील सर्व कामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्ता सुनिश्चित करावी, अशी उद्योजकांची ठाम मागणी आहे.

